Sunday, March 17, 2013

पेच

अतिशय विकल चेहऱ्याने जया सोफ्यावर बसली होती. उध्वस्त झाल्यासारखी. हाता-पायातली शक्ती गेली होती. चेहरा पांढराफटक पडला होता. 'आता पुढे काय?' एक एक धागा जुळवून आपले विचार मार्गावर आणण्याचा ती प्रयत्न करत होती. पण छे! कसलीच बेरीज लागत नव्हती. एकदम धाय मोकलून रडावसं वाटत होतं; पण रडत बसणे ही तिच्या प्रतिमेला आणि अस्मितेला साजेशी गोष्ट नव्हती. काहीही झालं तरी ती एक उच्चशिक्षित आणि स्वतंत्र मुलगी होती. त्यामुळे आता rationally विचार करून 'पुढे काय?' या प्रश्नाचं उत्तर सापडवणं अपेक्षित होतं. म्हणूनच भावनावेग आवरून डोकं तळ्यावर आणण्याचा तिचा प्रयत्न चालला होता. पण तरीही 'का?'

"का वागली असेल ती माझ्याशी असं? मी असं काय केलं की  तिने अशी शिक्षा द्यावी?' 

वर्षभरापूर्वीच जया आपला नवरा आणि दीड वर्षाचा छोटा पार्थ यांच्या बरोबर या घरात राहायला आली होती. कुणाशीही ओळख नसलेल्या या उच्चभ्रू वस्तीत राहायला जायचं म्हणजे थोडं दडपणच आलं होतं. दोघांचीही नोकरी आणि आता सोबतीला पार्थ. आजूबाजूला कुणीही ओळखीचं नाही… दडपण येणं तर साहजिकच होतं. पण आल्याबरोबर काहीच दिवसात जयाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर रोजच्या संपर्कात झालं आणि तिच्यामुळे सगळेच मार्ग सुकर झाले. तिलाही २ मुले होती. त्यामुळे पार्थची काळजी घेण्यासाठी ती जायला नेहमी उपयोगी गोष्टी सांगत असे. तिच्यामुळे जयाची काळजीच मिटली होती. 

जयानेही काही कमी केलं नव्हतं तिच्यासाठी. तिच्या मुलांसाठी नेहमी खाऊ, खेळणी आणणं, सणावारांना भेटवस्तू….  पण चांगल्या सुरळीत चाललेल्या आयुष्यांशी खेळणं हा तर नियतीचा आवडता छंदच!

आज जया ऑफिसमधून घरी येताच टेबल वर तिला एक चिठ्ठी दिसली… 

"बाईसाहेब, उद्यापासून मी कामावर एनार न्हाई. मला माज्या वस्तीपाशी दुसरं घर मिळालं आहे."

पुन्हा एकदा त्या चिठ्ठीवर नजर फिरवून जया मनाचा धडा करून उठली आणि तिने केरसुणी हातात घेतली!!