Monday, November 19, 2018

सृजन

कुणाच्या चपळ बोटांत
कुणाच्या बोलक्या डोळ्यांत,
कुणाच्या सुपीक डोक्यात,
कुणाच्या सुरेल गळ्यात.

किती तरी रूपं तुझी
किती तरी छटा
ना तुला लहान कुणी
ना कुणी मोठा.

ना भाषेचं बंधन तुला,
ना शब्दांचे पाश,
मनापासून मनापर्यंत
असा तुझा प्रवास!

तुझ्यामुळे रंगत आहे,
सुंदर आहे जग,
लहरीपणाचं मात्र काही 
होतंय का ते बघ

तुझ्या साधनेसाठी केव्हा
योजावा एकांत
आराधना मग तुझी करावी
संयत आणि शांत

धुडकाविशी तू सर्व आर्जवे
साऱ्या मिनतवाऱ्या
रुसून बसशी पाठ फिरवशी
कलाकृती अपुऱ्या

अवचित एका क्षणी अचानक
भेट तुझी घडावी
जशी काळोख्या उदास रात्री 
वीज लखलखावी

उजळून जावा काना कोपरा
स्वच्छ दिसावी वाट
पूर्णत्वाप्रति प्रवास होऊन
जावा निमिषार्धात

निर्मितीस त्या जीवन देई
तुझाच कानमंत्र
प्रसवकळांचा होऊन जातो 
क्षणार्धात सुखांत


Monday, August 20, 2018

शाळेचा पहिला दिवस!

रावीचा - म्हणजे माझ्या मुलीचा केजीचा आज पहिला दिवस होता. आत्तापर्यंत प्रिस्कूल - म्हणजे फक्त डबा खायचा, खेळायचं, झोपायचं आणि पत्रावळी भरभरून रंगकाम करायचं असं वेळापत्रक होतं. 

रावीला अगदी दीड वर्षांची असल्यापासून शाळेत जायची सवय आहे. अगदी ९ ते ६. तरीही त्याबद्दलचा गिल्ट, शाळेत कसं होईल यांचे काळजीवजा विचार अशा आई-सुलभ भावना १० दिवसांपासूनच माझ्याशी खोखो खेळत होत्या. शाळेच्या पेन्सिल, मार्कर, रंगपेट्या वगैरे सामानानी भरलेला खोका आम्ही वीकेण्डला तयार ठेवला होता. नवीन गोष्टींवर नावं घालायचा पहिलाच अनुभव. आतापर्यंत दुपारी शाळेत गुरगुरीत २ तास झोप काढायची तिला सवय होती. आता दुपारची झोप बंद. थोडाफार का होईना, अभ्यास सुरू. 

आज शाळेचा पहिला दिवस आहे हे पूर्ण विसरून नेमकी आजच मी तिच्या डाॅक्टरांची अपाॅइंटमेंट घेतली होती. वार्षिक चेकअप होतं, विशेष काही नाही. पहिल्याच दिवशी शाळेत उशीर होणार होता, पण इलाज नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने पुन्हा एकदा खात्री करून घेतली.

“आई इंजेक्शन नाहीए ना आज?” 

“नाही गं बाई. डाॅक्टर फक्त तपासणार.”

हे ऐकून तिचं समाधान झालं. 

आम्ही दवाखान्यात पोचलो. उंची, वजन, बाकीच्या छोट्या मोठ्या तपासण्या झाल्या. अगदी जाता जाता डाॅक्टरांनी टीबी टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट म्हणजे सुई हे मला आठवलं आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचं भरीत डोळ्यांसमोर दिसू लागलं. पकडापकडी, आरडाओरड, रडारड आणि मग रुसवे फुगवे.. सगळा क्रम दिसला आणि मी पदर खोचला. “आलीया भोगासी” म्हणत डाॅक्टरांच्या मागे जड पावलांनी मी इंजेक्शन रूममध्ये पोचले. रावीला अजून कल्पना नव्हती. त्यामुळे ती ‘मी किती शूर’ अशा अविर्भावात मजेत चालली होती. 

तिथे पोचल्यावर मात्र तिला कुणकूण लागली. सुया, सिरिंजेस दिसल्या तशा तिने काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. गुरं पळायच्या आधी जशी खुरं जमिनीवर घासतात तसा मला भास झाला. मी तिला पकडलं आणि सुरू केलं, “रावी ते चित्र किती छान आहे ना?”, “रावी ते बघ तुझ्यासारखं पेन” वगैरे. क्षणभर ‘आपली आई आत्तापर्यंत बरी होती’ असे एक्सप्रेशन देऊन तिने मुद्द्याला हात घातला. “आई मला इंजेक्शन नकोय”.

इतक्यात नर्स काकूंनी मला तिला मांडीवर घेऊन बसायला सांगितलं. आम्ही बसलो. नर्स काकू आणखीही काही सूचना देत होत्या; पण मला फक्त त्यांचं हलणारं तोंडच दिसत होतं. मी पूर्ण शक्तीनिशी रावीला धरून बसले होते. रावी रडकुंडीला आलीच होती, मी भोकाडाची वाट बघत होते. सगळी तयारी झाल्यावर नर्सकाकू म्हणाल्या, “आय वुइल् नीड हर राईट आर्म”. म्हणजे असं म्हणाल्या असाव्यात. मला काही ऐकू आलं नाही. मी “साॅरी, कम अगेन” ची जुळवाजुळव करत असतानाच अहो आश्चर्यम्! रावीने फ्राॅकची बाही मागे सारून हात पुढे केला! तिच्या मेंदूतलं बटण आॅन झाल्यासारखी ती पालटली. सुई जेव्हा त्वचेला स्पर्श करते ते मी आजही पाहू शकत नाही. आणि ही चिंटरी धीटाईने ते डोळे रोखून पहात होती, हू की चू न करता! माझा वासलेला आ बंदच होईना. ते सगळं पार पडल्यावर मी तिच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. “कसं असं झालं?” या प्रश्नावर तिने भाव खाऊन घेतला. मी कशी फ्रूट्स आणि व्हेजीटेबल्स खाते, त्यामुळं कशी मला शक्ती आलीए, वगैरे संवाद झाले. आम्ही गाडीत बसून शाळेत जात असताना ती स्वत: सुद्धा ‘असं आपल्याला कसं झालं’, याचा विचार करत असावी. मधेच म्हणाली, “आई जेव्हा तुला माझ्यावर प्राउड वाटतं, तेव्हा मला खूप हॅपी वाटतं.” तिच्या असल्या नौटंकीची पूर्ण सवय असूनही माझे डोळे धूसर झाले. 

शाळेत पोचलो. मी डबा, बाटली जागेवर ठेवेपर्यंत विजयी वीर घोळक्यात इंजेक्शनची खूण दाखवण्यात मग्न झाले होते. मी तशीच उभी होते थोडा वेळ. मग वळले. आता मला तिच्यापेक्षा माझीच जास्त काळजी वाटत होती!

Friday, July 13, 2018

मन पाऊस पाऊस! - २

                                                      
साताऱ्यात आणि एकूणच भारतात आल्यानंतर खादंतीला ऊत आला होता. तो अगदी निघेपर्यंत ओसरला नाही. यावेळी तर पावसाचे असे खास पदार्थही होते. गरमागरम खमंग खेकडा भजीला आणि बटाटेवड्यांना पावसाची ऍडिशनल चव असेल तर जी काय मौज येते, ती कॅलिफोर्नियात कशी बरं यावी! प्रयत्नही करू नये. महाबळेश्वरच्या धुक्यात, ओलसर थंडीत, रिपरिप पाऊस पडत असताना मक्याच्या कणसाची चव द्विगुणित नाही दहा गुणित होते. याशिवाय पावसाळ्याची खास फळंही यावेळेस लय दिसांनी चाखली. (अॅक्चुली हाणली). हापूस अगदी निसटता हाती लागला. फणसाचं तोंड क्ष वर्षांनी पाहिलं. पपई, पेरू, सीताफळं, चिक्कूही मिळाले

प्रतापगड चढताना जांभळं, करवंदं, गरे यांनी मजा आणली. रावी जांभळांवरच होती. खायला रानमेवा, आजुबाजूला रान आणि ऐकायला रानातल्या गोष्टी. दोन pairs of आजीआजोबा होते तिचा शब्द न् शब्द झेलायला. मजा करून घेतली तिने

प्रतापगडावर महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे. त्याभोवतीचा चौथरा आणि इतर बांधकाम सुरेख आहे. कड्यावरून जावळीच्या खोऱ्याचं हिरवंगार भव्य दर्शन झालं. कुठल्याही गडावर जाऊन असं कड्यावरून खाली पाहिलं की त्यावेळेस कसे वेढे भेदले असतील, कसे घोडे वर चढले असतील, या उंचसखल मावळप्रांतात कशा लढाया झाल्या असतील असे प्रश्न पुन्हा पडल्याशिवाय रहात नाहीत. प्रतापगडावर थक्क करणारी आणखी एक गोष्ट पाहिली. महाराजांचं एक पत्र दरवाज्यात मोठ्या बोर्डवर लिहीलेलं आहे. महाराजांच्या दूरद्रुष्टीचा हा मला आधी माहित नसलेला पैलू. त्यात महाराज आपल्या सरदारांना उद्देशून म्हणतात, “शस्त्रास्त्रे किंवा आरमाराच्या कामासाठी लाकडाची गरज लागते. हे लाकूड आपल्या प्रांतात मुबलक आढळणाऱ्या साग आदी झाडांचे वापरावे. फणस, आंबा . झाडे रयतेने आपल्या पुढच्या पिढीसाठी लावलेली जतन केलेली असतात. त्याशिवाय अशी झाडे तोडल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. एखादे फळझाड अगदी निकामी झाले असल्यासही मालकाच्या संमतीने तोडावे. बळजबरी कदापिही करू नये!” रयतेची आणि मातृभूमीची अशी काळजी घेणारा नेता विरळाच. ४०० वर्षांपूर्वी तो आपण जिथे उभे आहोत त्या मातीत होऊन गेला, या विचाराने शहारा आला!

मी लहान असताना आम्ही वर्षं वाई आणि वर्ष पाचगणीत होतो. त्यावेळच्या माझ्या शाळा बघून आलो. त्यावेळच्या घरांचं दर्शन झालं. आठवणी ताज्या झाल्या. पाचगणीच्या टेबल लॅंडवर जिथे आम्ही घोड्यावर रपेट मारायचो, तिथेच रावीनेही मारली. आपल्या अशा लहानपणीच्या गोष्टी आपल्या मुलांना दाखवण्यात एक वेगळीच मजा असते. त्याच इंटेन्सिटीने त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. कशा पोचणार? पण मजा वाटते एवढं खरं.

महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईमध्ये पाऊस आणि आठवणींमध्ये भिजून आम्ही वाईत मावशीकडे थांबलो. तिच्या पाहुणचाराचा समाचार घेऊन निघण्याआधी ढोल्या गणपतीच्या दर्शनासाठी कृष्णेच्या घाटावर आलो. तिथे शेजारीच माझी शाळा आहे. लहानपणी कधी शाळा सुटल्यावर आम्ही घाटावर यायचो. कृष्णामाई उत्सवात या घाटावर गाण्याच्या मैफिली, नाटकं पहायचो. पावसाळ्यात नदीला पूर आला की घाटच काय, मंदिराचा कळसही पाण्यात असायचा. मी खरंतर फार देवभोळी नाही. या आठवणी ताज्या करण्यासाठी असेल, पण मला गणपतीला जायचंच होतं.

त्या दिवशी संकष्टी होती. मनोभावे बाप्पाला नमस्कार करत मी गाभाऱ्यात पोचले. गणपतीची महाकाय दगडी मूर्ती माझ्यापासून फुटांवर होती. मूर्ती डोळ्यात साठवून मी हात जोडून नतमस्तक झाले आणि काहीतरी वेगळंच वाटू लागलं. गळा दाटून आला आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं. भावनावेग, पण अगदी अनोळखी भावना. होमसिकनेस, आप्तेष्टांना खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद, जुन्या आठवणींना उजाळा, त्या त्या वेळी आपलं घर मानलेल्या ठिकाणांचं दर्शन या सगळ्यांचं साठलेलं रडू असेल कदाचित. त्या त्या वेळेस मोठेपणाच्या बंधनांनी अडवून ठेवलेलं. बराच वेळ ते मला आवरत नव्हतं. या भावनांच्या निचऱ्यासाठी मी बाप्पाची ऋणी आहे. स्थलमहात्म्य म्हणतात ते हेच असावं! या दिवसाचीही हाय नोट वर सांगता झाली

एकूण यावेळची भारतवारी खास झाली. पावसाने समाधान दिलं. पुढच्या वर्षभराला पुरेल एवढं पेट्रोल आम्ही आमच्या टाकीत भरून घेतलं. इंजिनात वंगण घातलं. पावसानं धुवून गाडी चकचकीत करून टाकली. आता अजून तरी लोण्यासारखी पळते आहे. 

प्रतापगड 

प्रतापगड 

टेबल लँड, पांचगणी


Sunday, July 8, 2018

मन पाऊस पाऊस! - १



महाराष्ट्रीय अनिवासी भारतीयांसाठी जून-जुलै ही भारतवारीसाठी सर्वोत्तम वेळ आहे हे मी आज घोषित करते. डिसेंबर मध्ये - लग्ने अटेंड करता येत असली तरी. मान्सून यावेळेस आम्हाला तब्बल - वर्षांनी अनुभवता आला. पावसाळा हा भारतीय जीवनशैलीचा इतका महत्त्वाचा घटक आहे! त्याच्या आठवणींवर जळमटं तयार झाली होती. आणि त्यांची जाणीवही झाली नव्हती. यावेळी पावसाने सगळी जळमटं, धूळ धुवून काढली. आठवणी ओल्या झाल्या!

एरवीचा सह्याद्री आणि पावसातला सह्याद्री यांमध्ये दिवस रात्रीचा फरक आहे. पुण्यात सिंहगडावर गेलो तेव्हा पावसाने खो घातला होता. ( वर्षांनी सिंहगड चढलो, दीड तासात. not too shabby! :P ) पण तरी सह्याद्रीचं पहिलं दर्शन सुखावह होतं. हवेत पावसाच्या आधीचा दमटपणा होता. भजी, पिठलं भाकरी वगैरे मॅंडेटरी सोपस्कार करून पावसाची वाट पाहून उतरायला लागणार एवढ्यात धुक्याचं दर्शन झालं. पाहता पाहता ढग अंगावर येवू लागले. थंडगार वाऱ्याने मौसम सुहाना करुन टाकला. तिथून हलावंसंही वाटेना. इतक्या वर्षांचे तहानलेले आम्ही त्या ढगांमध्ये बराच वेळ वारा पीत राहिलो. धन्य झालो

खरंतर ही फक्त सुरूवात होती. साताऱ्यात आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी सज्जनगड, ठोसेघर असा बेत ठरला. गाडीने आम्ही सज्जनगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हाच जोरदार पाऊस सुरु झाला होता. टोप्या छत्र्या सावरत चढायला सुरूवात केली. सज्जनगडाला फारतर दोनशे पायऱ्या असतील. सुबक घोटीव दगडी पायऱ्या. त्यांच्यावरून वळणे घेत चढत असताना, खालच्या खोऱ्यात जे काही निसर्गदर्शन होत होतं, त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. धुकं, पाऊस, हिरवेगार डोंगर-दऱ्या, पायाखालचे ओले दगड, लाल माती, पाण्याचे लोट, चिखल, रिपरिप पाऊस आणि मधेच जोरादार सळक या सगळ्याचं मिश्रण हे अवर्णनीय होतं. थेट लहानपणात घेऊन जाणारं! लहानपणी शाळेत आपणमाझा आवडता ऋतू - पावसाळाअसा निबंध लिहायचो. त्यात धरणीमातेने जणू काही हिरवा शालूच पांघरला आहे वगैरे ठराविक वाक्यं असायची. त्यावेळेस त्या शालूचं काही वाटायचं नाही. घरका शालू ओढणी बराबर असल्यासारखं. पण घर सोडून वर्षं राहिल्यावर आपण निबंधात exactly काय लिहायचो हे कळलं

आता या ठिकाणी रावीला थोडं फुटेज ठेवणं अपरिहार्य आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो, की महाराष्ट्र सोडून एवढ्या लांब कुठेतरी मुलांना वाढवत असताना आपल्या आई वडिलांची मुळं त्यांना अगदी आपलीशी नाही, तरी ओळखीची वाटतील का? प्रश्न अजून सुटलेला नाही; पण जीव थोडा भांड्यात पडला यावेळेस. सिंहगडावर रावीने तुटक्या हाताने लढाई करणाऱ्या तानाजीचं चित्र पाहिलं. तिच्या कुतुहलानं डोकं वर काढलं आणि मी ते पडत्या फळासारखं झेललं. त्या दिवसापासून घरी दारी, झोपता उठता महाराजांच्या गोष्टी सुरू झाल्या. तिला जिकडे तिकडे मावळे, घोडे, गनीम दिसू लागले. आम्ही या सुट्टीत गड सर केले. सज्जनगडावर रावीने सुरूवातीलामाझ्या बुटात पाणी जातंयअन्छत्रीचं पाणी अंगावर पडतंयअशी रडकी सुरूवात केली, पण -१० पायऱ्यांतच तिच्यात महाराज संचारले. मग ती गड सर करूनच थांबली. मला छान वाटलं, पण कृतकृत्य वाटण्याचा क्षण पुढेच होता.

गडावर आम्ही रामदास स्वामींचं दर्शन घेतलं, मठात जाऊन आलो आणि मग प्रसादाच्या पंगतीला बसलो. सज्जनगडावर रोज आमटी-भाताचा प्रसाद असतो. अगदी साधं सात्विक अन्न. गोड्या मसाल्याची पातळ आमटी, भात, उसळ आणि खपली गव्हाची पाणी घालून (दूध नाही) केलेली खीर असा बेत. बसल्यावरच 'श्रीराम जयराम जय जय राम' चा गजर सुरू झाला. ताटं मांडली गेली, वाढायला सुरूवात झाली. सगळं वाढून होईपर्यंत सर्वांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या रामनामाने त्या अन्नावर आणि लोकांवर जणू संस्कार होत होते. मंतरलेलं वातावरण होतं. आमटी भाताच्या त्या पहिल्या घासाचं काय वर्णन करू! त्या पहिल्या घासातच ब्रह्मानंदी टाळी लागली.

मला उत्सुकता होती रावीची. पंगतीला खाली बसून हाताने भात खाणं मीही कितीतरी वर्षांनी करत होते, रावीची तर पहिलीच वेळ. एरवी तिचे खाण्याचे वर्षे वयाला साजेसे नखरे असतात. मी तिलाइथे चमचे आणि पेपर नॅपकिन्स नसतातअसं सांगून ठेवलं होतं आणि भरवण्याची तयारीही केली होती. पण आज तिने धक्के द्यायचंच ठरवलं होतं. १५ मिनिटात आपल्या हाताने तिने सगळं ताट स्वच्छ करून टाकलं. मिटक्या मारत. आणि म्हणालीमला अजून भात हवाय’. हाच तो क्षण! ही जादू त्या वातावरणाची, रामनामाची का फक्त तिला चढून भूक लागली होती, मला माहित नाही. पण त्या क्षणी मला आभाळ ठेंगणं झालं होतं. त्या वेळेस मला वाटलं, मुलं कशी निपजतात, यात त्यांच्या जडणघडणीचा मोठा वाटा असतोच, पण जीन्सही आपलं काम करतच असतात. अशा कधीतरी अनाहूत क्षणी ते आपलं अस्तित्व दाखवून देतात

अशा या हाय नोटवर आम्ही सज्जनगड उतरलो. पुढे ठोसेघर आणि मग परळी ते सातारा पदयात्रा. तेव्हाही खूप मजा आली, पण या वरच्या क्षणानंतर मला ते फिकं वाटतंय, त्यामुळे इथेच थांबते. प्रतापगड, पांचगणी, वाई पुढच्या भागात.

 सिंहगड - सह्याद्रीचं पाहिलं दर्शन

सिंहगडावरचे विधी १

सिंहगडावरचे विधी २

निवांतपणा

ठोसेघरचा धबधबा

सज्जनगड - श्री समर्थ महाद्वार

सज्जनगडावरून