Wednesday, October 10, 2012

उकल

ही पूर्वीच लिहिलेली एक गोष्ट इथेही जोडते आहे.
उकल
"सर्व नागरीकांस कळविण्यात येते की, आपल्या शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कुणीही घराबहेर पडू नये."
पोलिसांची गाडी पुन्हा एकदा लाउड स्पीकर वरून सूचना देत गेली. डॉ. प्रकाश गॅलरीतून आत आले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. शहरात सकाळपासून तणाव होता. दंगलीचे वारे वहात होते. मीनूची शाळा सुटून ४ तास झाले होते. तिला घेऊन येणारी रिक्षा अजून न अल्याने घरातील सर्वांचा जीव कासावीस झाला होता. कर्फ्यू असल्याने घराबाहेर पडायलाही बंदी. त्यामुळे सगळेच हतबल झाले होते. डॉ. प्रकाश मीनूला शोधण्यासाठी बाहेर पडले असता पोलिसांनी तिचा फोटो ठेऊन घेऊन त्यांना घरी परतण्यास सांगितले होते. मीनूच्या आईचा - सरीताचा अखंड स्तोत्र, मंत्र, जप यांचा घोष सुरू होता. घरातले देव केव्हाच पाण्यात बुडाले होते. 
"कशाला तुम्ही दोघे एवढी काळजी करता? येईल मीनू!" आजोबांनी वातावरण किंचित हलके करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पाहिला. पण त्यांचं हे अवसान उसनं होतं, हे सर्वांनाच  माहिती होतं. कारण मीनूचे घरात सर्वात जास्त मेतकूट आजोबांशीच जमत असे. आजोबाही तिच्याशी खेळता खेळता तिच्याएवढेच होत. ती वापरणारी सगळी संबोधनंही त्यांची होऊन जात. एरवी स्वतःच्या मुलाला बाबा, सुनेला आई आणि बायकोला आजी म्हणणारे आजोबा विरळाच!! नातीच्या काळजीने त्यांचा जीव टांगणीला लागला होता.
इतक्यात बंगल्याचे फाटक उघडून पोलिसांची जीप आत आली. सगळ्यांनीच खाली धाव घेतली. जीपमधून हवालदार बाहेर पडला. आणि त्याच्यामागून उडी मारून बाहेर पडली, लाडकी मीनू!! तिला पाहताच बाहेर पडलेले सुटकेचे निःश्वास हवालदारानेही ऐकले. मीनूला ती गुदमरेपर्यंत घट्ट जवळ घेऊन सगळ्यांनी साठलेल्या अश्रूंना वाट करून दिली.
            "शाळेजवळच्या चौकातून उचलली हिला. गाडीत सुखरूप होती. चौकात दंगा पेटला होता. त्यामुळे आणायला उशीर झाला." हवालदार म्हणाला. डॉ. प्रकाशनी त्याचे १० वेळा आभार मानले. त्याला भेट देऊ केली. पण ते पैसे न स्वीकारताच तो निघून गेला.
आजोबांना त्यांचा खेळगडी परत मिळाला खरा, पण तो आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. दंगा करणारी, खोड्या काढणारी मीनू आता शांत झाली होती. अकाली मोठी झाल्यासारखी. कधी शून्यात नजर लावून बसायची, कधी चिडचिड करायची. 'त्या' चौकातून कधी गेली, तर आपोआप तिला हुंदका यायचा. त्या दंगलीच्या दिवशी तिने काय पाहिलं होतं, हे कुणी तिच्या तोंडून कधीच नाही ऐकलं. कुणी ते विचारलंही नाही. पण तिच्या अवस्थेवरून ते स्पष्टच होत होतं. तिनं पाहिली होती नंग्या तलवारींनिशी संहाराचा खेळ खेळणारी चार - सहा अविचारी टाळकी. त्या एवढ्याश्या जीवाच्या कोऱ्या मनावर तो प्रसंग कायमचा कोरला गेला होता. तिरस्काराची बीजं कुठंतरी खोलवर रुजली गेली होती. तीही अजाणत्या वयात. हे सगळं कळत असूनही त्याला उपाय काय, हे कुणालाच सुचत नव्हतं.
दिवसागणिक मीनूचा विक्षिप्तपणा वाढत होता. रात्री - अपरात्री वाईट स्वप्नं पडून तिला जाग यायची. नंतर नंतर तर झोपही लागेनाशी झाली. तिचे हाल बघवत नव्हते. तिच्या मनात  रुजलेली ती तिरस्काराची बीजं त्याला अंकूर फुटायच्या आत खुडायला हवी होती. तिरस्कारावर प्रेमाचा, संहारावर निर्मितीचा नेहमी विजय होतो, हे तिला पटवून द्यायला हवं होतं. पण हे सगळं शब्दात समजावून सांगण्याइतकी ती मोठी नव्हती. सारेच असहाय्य झाले होते.
एक दिवस संध्याकाळी टेकडीवर फिरून आल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी सगळ्यांनी आनंद पाहिला. कोड्याची उकल झाल्याचा आनंद! दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून मीनूला घेऊन ते बाहेर पडले. सुरुवातीला नाखूष असणारी मीनू टेकडीवर सूर्योदय पाहताच जराशी माणसांत आली. त्या उगवत्या सूर्यासमोर आजोबा अणि त्यांची करंगळी धरून त्यांची ही नात असे उभे होते. नंतर आजोबांनी पिशवीतून चार - सहा बिया आणि खुरपं काढलं. मीनूला एका कोपऱ्यात खड्डा खणायला लावला. त्यात त्या बिया ठेवून खड्ड्यावर माती टाकायला सांगितली. "आता बघ मीन्या, बाप्पा कशी जादू करतो ते!" आजोबा म्हणाले.
त्या दिवसापसून रोज मीनू अणि आजोबा सूर्योदयाच्या वेळी टेकडीवर जाऊ लागले. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, मग वॉटर-बॅगेतून आणलेलं पाणी बियांच्या ठिकाणी घालायचं, माती मोकळी करायची, असा रोजचाच क्रम झाला. लवकरच कोंब फुटला. मीनूला त्या दिवशीएवढं आनंदी कधीच कुणी पाहिलं नव्हतं. आता ते एवढंसं रोप मीनूचं मूल झालं. आजोबा कधी येऊ शकले नाहीत, तर ती एकटी टेकडीवर जायची. आपल्या रोपाच्या ओढीने. दोघं एकत्र मोठी होत होती. जसजसं रोप वाढू लागलं, तसतसं मीनूच्या मनातील मळभ दूर होऊ लागलं.
हळूहळू ती पूर्वीसारखी हसू - खेळू लागली. अभ्यासात लक्ष देऊ लागली. निर्मितीचा आनंद तिने अनुभवला होता. आणि अनुभवासारखा दुसरा गुरु तो कुठला!! आजोबांना जे काही सांगायचं होतं, ते या अनुभवाने तिला शिकवलं. ते रोप आधी तिचं मूल होतं. नंतर तिच्या सगळ्या गोष्टी वाटून घेणारा तिचा मित्र झालं, कालांतराने आजोबा गेल्यावर ते तिचे आजोबा बनलं.
त्या माझ्या आजोबांच्याच सावलीत बसून मी मीनू, आता डॉ. सौ. मीना जोशी, माझा हा अनुभव कागदावर उतरवत आहे. तुम्हाला एखादी रस्ता चुकलेली मीनू कुठं आढळली, तर द्या तिला वाचायला. कदाचित तिला मदत होईल.

4 comments:

  1. खुप छान. मला माहित नाही की याचा वस्तव्याशी काही सम्बन्ध आहे की नाही. पण नसावा असे वाटते.

    ReplyDelete
  2. :) नाही.. पूर्ण काल्पनिक.

    ReplyDelete
  3. Chhanach...
    Me adhi vachali hoti bar ka hi...

    Naveen kahitari chhan, lihaychi vel zali ata ! :)

    ReplyDelete
  4. भावे तुम्ही भावेगिरी कधी बंद करणार? :P :D
    पण थांकू बरं का. आणि लिहिणार :)

    ReplyDelete